Monday, October 09, 2006

मुखडा

"आपुला संवाद आपणासी" सुरु केले तेव्हा तिथे काही कविता उतरतील अशी कल्पना किंवा योजना नव्हती. हळू हळू जुन्या पुराण्या कविता आठवून त्या नोंदल्या, तर कधी त्यांना नवीन साज चढवायचे सुचून गेले. आणि कधी कधी तर "गज़ल पहावी रचून" या हट्टाने गज़ल मिश्रित कविता उतरल्या. क्या करे आजकल मिज़ाज ही कुछ शायराना है!

शाळेत असताना अक्षरश: र ला र आणि ट ला ट जुळवून केलेल्या कविता आठवल्या की आता हसू येते. पण त्याही वेळेला घरी दारी त्याचे भरपूर कौतुक करून घेतले. माझा एक दादा तर येता जाता "काय कवयित्री बाई" म्हणून चिडवायचा, तेव्हा जाम गुदगुल्या व्हायच्या, खोटे कशाला बोलू? तशी आता काही फार प्रगति आहे अशातला भाग नाही, पण एक वेगळा ब्लॉग सुरु करावा असा विचार मनात येण्या इतपत नक्कीच आहे! आणि या ब्लॉगला कवी कुसुमाग्रजांच्या ओळींनी स्फूर्ती दिली तर काय नवल? अर्थात सुजाण वाचकांनी यात कुठेही माझी उडी त्यांच्या जवळपासही फिरकण्याचा प्रयत्न आहे असा कटु गैरसमज करून घेऊ नये ही नम्र विनंति. पण "राजहंसाचे चालणे" या न्यायानी मी देखील म्हणू शकतेच की भले कुसुमाग्रजांनी कितीकांचा आंतर अग्नी फुलवला असेल, मीही माझी एक ठिणगी का फुलवत ठेऊ नये?

गाणं तुझं गात रहा, हळवं असो किंवा भेदक
मीही सुरात सुर मिसळीन

चित्र तुझं रेखत रहा, तरल असो किंवा भडक
मीही रंगात रंगून जाईन

खेळ तुझा खेळत रहा, पोरकट असो किंवा रंजक
मीही खेळात दंगून जाईन

नाच तुझा नाचत रहा, डौलदार असो किंवा राकट
मीही ताल धरून डोलीन

शास्त्र तुझं शोधत रहा, गूढ असो किंवा सुलभ
मीही ज्ञानकण वेचत राहीन!

कविता तुझी रचत रहा, मुक्‍त असो किंवा सुबक
मीही शब्द जुळवत राहीन

1 comment:

Gayatri said...

waa! liheet rahaa, waachat raaheen! :)